Mumbai Indians साठी 'या' समीकरणाने प्लेऑफचा मार्ग अजूनही खुला; पाहा कसं आहे गणित?

IPL 2024 Mumbai Indians Playoffs Scenario: कोलकाताविरूद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सची टीम 11 पैकी 3 सामने जिंकून आयपीएल 2024 पॉईंट्स टेबलमध्ये 9 व्या क्रमांकावर आहे. आयपीएलच्या प्लेऑफचं समीकरण पाहिलं तर त्यांना अजूनही 12 गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरण्याची संधी आहे.

सुरभि जगदीश | Updated: May 4, 2024, 10:50 AM IST
Mumbai Indians साठी 'या' समीकरणाने प्लेऑफचा मार्ग अजूनही खुला; पाहा कसं आहे गणित? title=

IPL 2024 Mumbai Indians Playoffs Scenario: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या टीमला यंदाच्या आयपीएलमध्ये साजेसा खेळ करता आला नाही. 3 मे रोजी झालेल्या सामन्यात मुंबईला कोलकात्याविरूद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सच्या टीमचा प्लेऑफ गाठण्याचा प्रवास अजून खडतर झाला आहे. याचाच अर्थ मुंबईची टीम अजूनही अधिकृतरित्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेली नाही. मुंबईच्या टीमला अजूनही प्लेऑफ गाठण्याची संधी आहे. हे समीकरण नेमकं कसं आहे, त्यावर नजर टाकूया. 

कोलकाताविरूद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सची टीम 11 पैकी 3 सामने जिंकून आयपीएल 2024 पॉईंट्स टेबलमध्ये 9 व्या क्रमांकावर आहे. आयपीएलच्या प्लेऑफचं समीकरण पाहिलं तर त्यांना अजूनही 12 गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरण्याची संधी आहे. होय, यासाठी मुंबईच्या टीमला इतर संघ आणि नेट रनरेटवर जोर द्यावा लागणार आहे. 

प्लेऑफ गाठण्यासाठी कसं असणारे समीकरण?

सध्या आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स टॉपवर आहे. त्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये पहिली आणि दुसरी जागेसाठी टीम निश्चित आहे. यानंतर लखनऊ सुपर जाएंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात 8 मे रोजी सामना रंगणार आहे. या दोन्ही टीम हा एक सामना सोडून इतर सर्व सामने हरल्या तर 8 तारखेला होणाऱ्या सामन्यात जिंकणाऱ्या टीमचे 14 पॉईंट्स होतील. यावेळी ती टीम तिसऱ्या स्थानी राहील.  

अशा स्थितीत, इतर 7 टीम्सना 12 पॉईंटसह प्लेऑफसाठी पात्र ठरण्याची संधी असेल. त्यामुळे यामध्ये मुंबई इंडियन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचाही समावेश असणार आहे. अशावेळी मुंबईला प्लेऑफ गाठण्यासाठी नेट रनरेट देखील सुधारावं लागणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सचे प्रत्येकी 10-10 गुण आहेत. जर दोन्ही टीम्सने फक्त 1-1 सामना जिंकला तर त्यांचे फक्त 12 पॉईंट्स होतील. तर पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्सला हा अंक गाठण्यासाठी उर्वरित चारपैकी दोन सामने जिंकावे लागणार आहे.

कोलकात्याकडून मुंबईचा पराभव

आयपीएलमध्ये शुक्रवारी कोलकाता नाइट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा 24 रन्सने पराभव केला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबईला विजयासाठी 170 रन्सचं आव्हान दिलं होतं. ज्याचा पाठलाग करताना मुंबईची संपूर्ण टीम 18.5 ओव्हर्समध्ये अवघ्या 145 रन्समध्ये ढेपाळली. त्यामुळे कोलकाताने 12 वर्षानंतर पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर हरवण्यात यश मिळवलं आहे. 2012 मध्ये कोलकाताने मुंबईचा पराभव केला होता. त्यानंतर मुंबईने वानखेडेवर निर्विवाद सत्ता गाजवली.